पोखरण रोडवरील तरुणाच्या खूनप्रकरणातील दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ठाणे गुन्हे शाखा युनिट-५ची धडाकेबाज कारवाई

Satya Nirnaya
0

तरुणाच्या खूनप्रकरणातील दोन आरोपी २४ तासांत जेलबंद 

ठाणे, दि. ६ जून : वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखरण रोड क्रमांक २ परिसरात घडलेल्या तरुणाच्या खूनप्रकरणाचा छडा अवघ्या २४ तासांत लावत ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-५ने दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि तत्परतेने राबविलेल्या शोधमोहिमेमुळे आरोपींना कसारा रेल्वे स्थानक परिसरातून जेरबंद करण्यात आले. या कारवाईमुळे ठाणे पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

दि. ५ जून रोजी ठाणे पश्चिम येथील गांधीनगर परिसरात राहणारा दीपक भूषण जैस्वार (वय २३) हा पोखरण रोड क्रमांक २ येथील हनुमान मंदिराजवळ असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. वर्तकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक पोलिसांसोबतच गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-५नेही समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची माहिती गोळा केली. त्यानुसार अजय देवकीलाल गिरी (वय २८) आणि शिवा संजय गोस्वामी (वय २५) या दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आरोपींच्या हालचालींबाबत तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असता ते पनवेल रेल्वे स्थानकावरून गोरखपूर एक्स्प्रेसने उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार तेजस ठाणेकर आणि मिनिनाथ शिकारे यांच्या पथकाने तातडीने कारवाई सुरू केली. आरोपींचा रेल्वेमार्गे गुप्तपणे पाठलाग करण्यात आला. अखेर सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपींसोबत असलेल्या आणखी १३ संशयित व्यक्तींनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. खून करण्यामागील नेमके कारण काय होते, या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होते का, तसेच आरोपी आणि मृत दीपक जैस्वार यांच्यात पूर्वीपासून काही वाद होते का, याचा तपास वर्तकनगर पोलीस करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) पराग मनेरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा उलगडा अल्पावधीत करण्यात यश आले.

अवघ्या २४ तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात यश मिळाल्यामुळे ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-५च्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जलद तपास, तांत्रिक माहितीचा प्रभावी वापर आणि अचूक नियोजन यांच्या जोरावर ठाणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. पुढील तपास वर्तकनगर पोलीस ठाण्याकडून सुरू असून या प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)